बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा साठवण तलावात बुडून,सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांड्यातील घटना!
Two children who went to wash the bull drowned in a storage pond, incident in Nandgaon Tandya, Soygaon taluka!
आबा सूर्यवंशी
(सोयगाव, छ.संभाजीनगर, मराठवाडा)
सोयगाव – उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आलेल्या भाच्या सह मामाचा मुलाचा बैल धुण्यासाठी गेले असता साठवण तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर तिसऱ्या बालकाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नांदगाव तांडा येथे घडली.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अकिल शकील पठान( वय १८) रा.नांदगांव तांडा, ता. सोयगाव, रेहान भिकन शेख (वय १५) रा. सातगाव डोंगरी ता. पाचोरा असे साठवण तलावात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून साकिब कलंदर पठाण (वय १३) रा. घटनांद्रा ,ता. सिल्लोड हा मात्र पाण्यातून बुडालेला असताना त्यास वाचविण्यात एका मुलीला यश आले आहे.यातील मयत रेहान भिकन शेख हा नांदगाव तांडा येथे मामा शकील पठाण याच्याकडे तर वाचलेला सकीब कलंदर पठाण हा त्याचा बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आला होता. दरम्यान शनिवारी हे तिघेही बैल धुण्यासाठी नांदगाव तांडा साठवण तलावा जवळ गेले होते. त्या तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले साठवण तलावात कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच त्यांतील मनीषा कैलास बागुल या अठरा वर्षीय मुलीने साठवण तलावात उडी घेऊन या तिघांना वाचविण्यासाठी तब्बल २३ मिनिटे पाण्याशी झुंज दिली. मुलीच्या हातात तिघेही न आल्याने यातील साकीब कलंदर पठाण हा तेरा वर्षीय बालक हाती आल्याने तो बुडालेल्या अवस्थेत मनीषा बागुल ने मोठ्या शर्थीने बाहेर काढून वाचविले. दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अकिल पठाण व रेहान शेख यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले व शवविच्छेदन साठी पाचोरा येथे खासगी रुग्णालयात पाठविले पाण्यातून वाचलेल्या साकीब पठाण वर पाचोरा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सायंकाळी उशिरा महसूल च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
जनतेच्या समस्यांकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!
तहसीलदार मनीषा मेने यांचेशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता, तर नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांचेशी संपर्क साधला असता मी अद्याप प्रशिक्षण वर आहे संबंधित तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे तलाठी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.