पत्रकारांच्या पुढाकाराने सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक
आमदारांचे, प्रांताधिकाऱ्यांना बँक मॅनेजरांची बैठक लावण्याचे फर्मान!
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)
पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन गरजांशी निगडित असलेला विषय म्हणजे एटीएम सेवा आणि बँक व्यवहारांतील सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी. या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेतला असून, दि.२९ मे रोजी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिनिधी व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांना निवेदन आले.या प्रसंगी पत्रकार संदीप महाजन , लक्ष्मण आबा सूर्यवंशी, अनिल आबा येवले, भास्कर सोनवणे,डॉ. योगेश पाटील, जावेद शेख,नरसिंग भुरे, प्रवीण बोरसे, चिंतामण पाटील, निखिल मोर, दिलीप पाटील,संजय पाटील उपस्थित होते.
पत्रकारांच्या निवेदनाची दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तत्काळ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने कृती सुरू केली आहे. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात उद्या दिनांक ३० मे रोजी पाचोरा शहरातील सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्याची परिस्थिती पाहता, शहरासह ग्रामीण भागातील लोक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे एटीएम केंद्रे वारंवार बंद असल्याने, नागरिकांना आवश्यक त्या वेळी रोख रक्कम मिळण्यात अडचण येत आहे. काही ठिकाणी ‘नेटवर्क समस्या’,कॅश उपलब्ध नाही देखभाल सुरू आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे बँक मॅनेजर,कर्मचारी ग्राहकांना देतात. सध्या खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी रोख रक्कमेची निकड असते. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक कर्जाच्या स्वरूपात रक्कम जमा झालेली आहे. परंतु एटीएम सेवा बंद असल्यामुळे किंवा बँकांमध्ये होणारी गर्दी, तांत्रिक अडचणीमुळे त्यांना आपलीच रक्कम वेळेवर मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत कोलमडले आहे.
बँक व्यवस्थापनांनी निवेदनातील मागण्या ५ जून पर्यंत मार्गी लावाव्या अन्यथा, जनहितार्थ सामाजिक बांधिलकीतून लोकशाही मार्गाने पत्रकार तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.