बाबा समजून का घेतला जात नाही ?

माझा संसार .., माझं कुटुंब .., माझी पोरं .., माझं घर.., मी… मला … माझं सारं भ्रांतीच ओझ घेऊन माणूस आयुष्य काढतो.. जीवाच रान करतो.. संसाराचा गाडा हाकतो.. मुलांना लहानाचं मोठं करत शिक्षण देतो. पण अखेर त्याच्या खांद्यावरचं ओझ …हे ,ओझचं राहत.. ते उतरवण्याच्या वेळेस जवळ मात्र कुणीच नसत… झुरत असतो जीव, गुदमरत असतो श्वास , थरथरत असते शरीर.., संसारासाठी श्रम वेचणाऱ्या माणसाचा शेवट मात्र वृद्धाश्रमात जातो. तिथे कुणीच नसत त्याचं.., आपलं म्हणणार , बाबा औषध घ्या असे मायेनं बोलणारं.. आठवड्यातून किंवा महिन्यातून फार तर वर्षातून फोन येतो बाबा कसे आहात , जेवलात का.. औषध घेता ना वेळेत .., आमची आठवण तर येत नाही ना तुम्हाला.., मुलाच्या या प्रश्नावर बाबा हसतो..आणि फोन ठेवत ढसाढसा रडत बसतो.

बाबाला संयमाचा घाट म्हटल गेलं आहे. खरंच बाबा हा संयमीच आहे. कुटुंबावर त्याच्याच लला जास्त असतो पण तो दाखवत नसतो. कुटुंबावर नुसती संकटे ओढवली तरी तो पहाडा सारखा उभा राहून संकटे परतवून लावतो. पण उतारवयात संयमाच्या या घाटाकडे जेव्हा मुले पाठ फिरवतात तेव्हा मात्र हा उंच पहाडा सारखा बाबा जगताना हजारदा मरत राहतो. आई समजून घेतली जाते पण बाबा मात्र कधीच कुणाला समजत नाही. समजतो तो फक्त मेल्यानंतर. घरावर संकटे आल्यानंतर , जो पर्यंत बाबा असतो तो पर्यंत तो मारकुटा, रागीट असाच संबोधला जातो . तो धाक ठेवतो म्हणून तर घराकडे कुणाची वाईट नजर पडत नाही. मुलं देखील चांगल शिक्षण घेऊन मोठी होतात. आपला बाबा आपल्याला स्वातंत्र्य जीवन जगू देत नाही असाच समज बहुतेक पाल्यांचा असतो पण शाळेच्या मास्तरा नंतर बाबा हा आपल्या घराचा हेडमास्तरच असतो.

चांगल घर , मुलांना शिक्षण देण्यात बाबाचं आयुष्य जातं. पुढें निवृत्ती घेऊन पेन्शन घेऊन सुखी समाधान जीवनाचा बाबा विचार करतो तेव्हा मात्र पेन्शनच्या वेळेस त्याला टेन्शनच अधिक असत. नियतीचा फेरा कधीच कुणाला चुकला नाही . जे पेरणार तेच उगवणार. जन्मदात्या आईबाबांशी मूल जशी वागतात तेच रिटर्न त्यांच्या नशीबी येते. त्यामुळे मुलांनी आयुष्यात कितीही मोठे झाले तरी आईचे वात्सल्य आणि बाबाचा संयमाचा घाटाला पाठ दाखवू नये. शेवटी तहान लागते तेव्हा पाणी आणि भूक लागते तेव्हा जेवण टाळता येत नाही कारण आई बाबा हेच खर जीवन आहे. बाबा गेल्या नंतर त्याला समजून घेण्यात अर्थ नाही . तो जीवंत आहे तोवर त्याच्याशी प्रेमाने , मायेने वागलात तरी त्याला आवडेल पण ज्यांच्यासाठी त्याने आयुष्याचं रान केलं त्याला अखेरला वृध्दाश्रम दाखवलंत तर हाच बाबा हजारदा मनातून खचेल.

नीलेश पांडुरंग मोरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button