Akola news:जिल्ह्यात दि. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान आयुष्मान भव मोहिम:जिल्हाधिकारी अजित कुंभार
रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोला, दि. 31 : केंद्र शासनाची आयुष्मान भव मोहिम दि. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांत राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्दे्श जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.आयुष्मान भव मोहिम व नियमित लसीकरणाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर आदी उपस्थित होते.श्री. कुंभार म्हणाले की, सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्मान भव ही मोहिम महत्वाचे पाऊल आहे. मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यादृष्टीने अचूक कृती आराखडा व गावोगाव प्रभावी अंमलबजावणी करावी. मिशन इंद्रधनुष मोहिमेत दि. 11 ते 16 सप्टेंबर, तसेच दि. 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. ते नियोजित कालावधीत पूर्ण करावेत.लसीकरणाबाबत जिल्ह्यात व्यापक जनजागृती व होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोहिम स्तरावर काम व्हावे. स्थानिक यंत्रणेला प्रोत्साहित करा.स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच स्वयंसेवी संस्था, बचत गट यांचेही सहकार्य मिळवावे. आयुष्मान योजनेत गोल्डनकार्डचे उद्दिष्ट १० लाख ७८ हजार असून जिल्ह्यात ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाला गती द्यावी. आयुष्मान सभा व्यापक स्वरूपात आयोजित कराव्यात व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.