Devendra Fadnavis आणि Jyotiraditya Scindia यांच्या हस्ते फ्युचर-रेडी अंधेरी आरएस पोस्ट ऑफिसचे उद्घाटन
जन सेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत अंधेरी आरएस पोस्ट ऑफिसचे आधुनिक, डिजिटल आणि नागरिक-केंद्रित केंद्रात रूपांतर

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि केंद्रीय दळणवळण व ईशान्य विकास मंत्री Jyotiraditya M. Scindia यांच्या हस्ते आज ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या फ्युचर-रेडी अंधेरी रेल्वे स्टेशन (आरएस) पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम तसेच महाराष्ट्र व गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह उपस्थित होते.
सन १९३२-३३ मध्ये स्थापन झालेले अंधेरी आरएस पोस्ट ऑफिस आता आधुनिक, नागरिक-केंद्रित आणि तंत्रज्ञान-सक्षम सेवा केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. येथे आधुनिक पायाभूत सुविधा, सुधारित ग्राहक सेवा आणि डिजिटल इंटिग्रेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
इंडिया पोस्टच्या ‘जन सेवा कनेक्ट’ या प्रमुख उपक्रमांतर्गत हे नूतनीकरण करण्यात आले असून, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या School of Planning and Architecture, New Delhi यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
पारंपरिक पोस्ट ऑफिसची भावनिक ओळख आणि विश्वास कायम ठेवत त्यांना आधुनिक सेवांशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आधुनिक वास्तुरचना, ग्राहक-अनुकूल सेवा, वेगवान कामकाज, डिजिटल सुविधा आणि एकसंध ब्रँडिंग यावर या प्रकल्पात भर देण्यात आला आहे.
School of Planning and Architecture, New Delhi यांनी अंधेरी आरएस पोस्ट ऑफिसच्या संकल्पना, वास्तुरचना आणि अंतर्गत डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले,
“१७० वर्षांहून अधिक वारसा आणि देशभरातील दीड लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसच्या जाळ्यासह इंडिया पोस्ट आजही आर्थिक समावेशन आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. २०२५-२६ या वर्षात विभागाने ग्रॉस पोस्टल रेव्हेन्यूमध्ये १६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.”
ते पुढे म्हणाले,
“नोटिफिकेशन्स, सततची स्क्रोलिंग आणि ब्ल्यू टिकपुरत्या मर्यादित संवादाच्या या काळात आता पुन्हा पत्रलेखनाच्या भावविश्वाकडे परतण्याची गरज आहे. हस्तलिखित पत्रात जी भावना, वेळ आणि माणुसकी असते ती कोणत्याही इंस्टंट मेसेजमध्ये नसते. दररोज किमान एक तास मोबाईल बाजूला ठेवून आपल्या भावना आणि विचार लिहिण्यासाठी दिला पाहिजे. अनेकदा मनातील भावना स्क्रीनपेक्षा शाईतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. पोस्ट ऑफिस आता फक्त पत्र पोहोचवत नाही, तर आपल्याला पुन्हा स्वतःशी जोडत आहे.”सिंधिया यांनी नव्याने विकसित अंधेरी आरएस पोस्ट ऑफिस हे इंडिया पोस्टच्या परंपरेपासून तंत्रज्ञानाकडे होत असलेल्या प्रवासाचे आणि नागरिक-केंद्रित सेवांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे सांगितले.उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील पोस्टमन, पोस्टवुमन आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.



